संगमनेर,३१ प्रतिनिधी- तालुक्यातील भोजापूर प्रकल्पाच्या पूरचारीचा समावेश दमणगंगा–वैतरणा-गोदावरी नदीजोड प्रकल्पात करण्याच्या प्रस्तावाला महायुती सरकारने मान्यता दिल्याने जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भोजापूर पूर चारीद्वारे तालुक्यातील अवर्षण प्रवर्षण भागातील जलसाठे भरून देण्याच्या निर्णयामुळे ३५ पाझर तलाव भरले जाणार असून, असल्याने लाभक्षेत्रातील ६०६.६३ हेक्टर क्षेत्राला दिलासा मिळणार आहे.
तालुक्यातील भोजापूर मध्यम प्रकल्प हा संगमनेर आणि सिन्नर तालुक्यातील दुष्काळी भागाकरीता वरदान ठरणारा प्रकल्प आहे. या प्रकल्पावर अवलंबून असलेल्या २७ गावांचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी या प्रकल्पाचा समावेश दमणगंगा–वैतरणा-गोदावरी नदीजोड प्रकल्पात करण्याबाबत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी निर्णय घेतला होता. याबाबत गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाकडे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाला मान्यता मिळाली असून, विभागाने घेतलेल्या निर्णयामुळे भोजापूर पुर चारीसाठी ४ द.ल.घ.मी.पाणी प्रस्तावित करण्यात आले आहे. या माध्यमातून ६०६.६३ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचा जलसंपदा विभागाचा प्रयत्न आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी गोदावरीच्या तुटीच्या खोऱ्यात वळविण्याचे प्रयत्न प्रशासकीय स्तरावर वेगाने सुरु झाले आहेत. भोजापूर प्रकल्पाचा समावेश दमणगंगा-वैतरणा-गोदावरी नदीजोड प्रकल्पात करुन सिन्नर आणि संगमनेर तालुक्यातील दुष्काळी गावांना दिलासा देण्याची ग्वाही जलसंपदा मंत्री विखे पाटील यांनी दिली होती. प्रस्तावाला मिळालेल्या मान्यतेमुळे भोजापूर लाभक्षेत्रातील गावांमधील अंदाजे ३५ पाझर तलाव आणि जलसाठे भरुन दिले जातील

प्रामुख्याने चिंचोली गुरव, पिंपळे, सोनेवाडी, नान्नजदुमाला, सोनोशी, पोखरी हवेली, तळेगाव, करुले, तिगाव, आदी गावामधील पाझर तलावांचा समावेश आहे. पूरचारीद्वारे पाणी देण्याच्या झालेल्या महत्वपूर्ण निर्णयामुळे दुष्काळी गावाला मोठा दिलासा मिळणार आहे.यापुर्वी जलसंपदा विभागाच्या माध्यमातून भोजापूर चारीच्या कामासाठी मंत्री विखे पाटील यांनी निधीची उपलब्धता करून दिल्यामुळे चारीचे काम करण्यात आले होते.






